गुरुवार, २७ मे, २०१०

॥ श्री ॥
मुळ नक्षत्र आणि उपनयन संस्कार मुहूर्त

काल एक उपनयन संस्काराची पत्रिका आली. म्हणजेच मुलाच्या मुंजेसाठी आमंत्रण आले होते. पत्रिका पाठवणारे वेदसंपन्न पुरोहित आहेत. उपनयन सस्कांराचा मुर्हूत दिनांक ३० मे २०१० सकाळी १०.११ मिनिटाचा नाशिक येथे आहे. मी काही पत्रिका पाहीली नाही. रात्री घरी आलो व आमच्या सौभाग्यवतींना म्हटले तुला नाशिकला श्री शंकराच्या दर्शनाला जायचे आहे ना? चल आपली दोन दिवसाची सोय झाली ( म्हणजे फ़ुकटात नव्हे ) अजयच्या भाच्याची मुंज आहे. अजयने आपल्यासाठी राहाण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या सौभाग्यवतींना व मुलगा ( वैभव ) यास आनंद झाला. चला मे २०१० चा शेवट गोड होत आहे. पत्नी व मुलानी एका स्वरात मला सांगितले ३० मे २०१० रोजी सकाळी आपल्या विभागात मतदान आहे. मतदान सकाळी उरकून आपण लगेच प्रवासाला निघूया. सवयी प्रमाणे मुलाने पंचाग आमच्या सौभाग्यवतींच्या हाती दिले आणि म्हटले मातोश्री लागा कामाला. आणि आमच्या सौभाग्यवतींने पंचग उघडले आणि मोठा चमत्कारीक आवाजात म्हटले अहो त्यादिवशी “मूळ” नक्षत्र आहे. ह्या लोंकानी हा कसा मैजिबंधनाचा ( उपनयन संस्काराचा ) मुहुर्त काढलेला आहे तो मुहूर्त चूक की बरोबर आहे. ह्या विषयी मला पहिल्यादा माहिती द्या? आम्ही लागलो कामाला.

ज्योतिषशास्त्रानुसार जेष्ठा व मुळ नक्षत्रावर जन्म झाल्यास ज्योतिषाला ह्या नक्षत्राबद्दल अधिक माहिती लोंक विचारीत असतात. त्यासंबंधी अनुभवाच्याद्वारे व ग्रंथ साह्याने माहिती देत आहे. ह्या पध्दतीला भारतीय परंपरा आहे.

मुळ नक्षत्र हा प्रामुख्याने जननदोषा करता आहे असे सर्व लोंकाचे गृहीत आहे.

मूलाद्यपादे पिंतर निहन्याद्‌ द्वितीयेक मातरमाशु हन्ति । तृतियके वित्त विनाशक: स्वाच्चुतुर्थके समुपैति सौख्यम्‌ ॥

अर्थ :- मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणी जन्म असता बापाचा व द्वितीय चरणी मातेचा नाश होतो. तृतीय चरणी संपत्तीचा नाश होतो व चतुर्थ चरणी सुखी होतो. त्याप्रमाणे वाचनात अलेल्या माहीती प्रमाणे मूळ नक्षत्राच्या सर्व घटी १५ नी विभागाव्यात व खालीलप्रमाणे प्रत्येक विभागाचे फ़ल पहावीत.

१. बापाचा मृत्यू, २. चुलत्याचा मृत्यू, ३. बहिणीच्या नव-याचा मृत्यू ४. वडिलांच्या बापावा मृत्यू, ५. मातेचा मृत्यू, ६. मावशीचा मृत्यू, ७. मामाचा मृत्यू. ८. चुलतीचा मृत्यू, ९. सर्वनाश, १०. पशुनाश, ११. नोकराचा मृत्यू, १२ जन्मलेले बालक स्वत:मरते, १३. जेष्ठ भांवडाचा मृत्यू १४. बहिणीचा मृत्यू, १५ आईचा वडील मृत्यू पावतात.

काही ग्रंथकरांच्या मते मूळ हा वृक्ष मानून त्याचे चार भाग करतात. पहिला भाग वृक्षाचे मूळ घरास नाशकारक, दुसरा भाग स्तंभ, धननाश व मातेला वाईट, तिसरा भाग वृक्षाच्या फ़ांद्या – पित्याला वाईट, चौथा भाग वृक्षपत्रे – परिवारास वाईट.

मूळ नक्षत्र वास व फ़ल :- फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या महिन्यात मूळ नक्षत्र पाताळी असते. आषाढ, आश्विन, माघ व भाद्रपद ह्या महिन्यात मूळ नक्षत्र मूळ नक्षत्र स्वर्गी असते. श्रावण, कार्तिक, चैत्र, पौष ह्या महिन्यात मूळ नक्षत्र मृत्यू लोकांत असते. स्वर्ग आणि पाताळ ह्या ठिकाणी मूळ नक्षत्र असता जन्मलेले मूल शुभकारक व मृत्यूलोकी असता अशुभकरक जाणवे. तृतिया षष्ठी, दशमी शुध्द चतुर्दशी ह्या तिथीस आणि शनिवार व मंगळवार ह्या दिवशी मूळ नक्षत्रावर जन्मलेले मूल कुलाचा उच्छेद करते असे शास्त्रात म्हटले आहे.

मूळ नक्षत्र जनन दोषापवाद :- नाशिकचे प्रसिध्द जुन्या काळातील ज्योतिषी कै. यज्ञेश्वर गोविंद घोलप यांनी व्यवहार ज्योतिष ह्या पुस्तकात अस अपवाद दाखविला आहे. अश्विनी, भरणी, कृत्तिका मृग, आर्द्रा, पुनर्वसू, हस्त, चित्रा, स्वाती, रेवती जेष्ठा ह्या नक्षत्रांवर सूर्य संचार करीत असता मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या अर्भकापासून अरिष्टाची भीती नसते.

परिहार :- मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यास १२ व्या दिवशी पित्याने मूळ नक्षत्र शांती करावी.

सर्वारंभ मुहूर्त :- कोणत्याही कार्याचा प्रारंभ करताना आपल्य जन्मकुंडलीतील बारावे आणि आठवे स्थान शुद्ध असणे आवश्यक आहे. या दोन स्थानी कोणताही ग्रह असू नये. जन्मराशीतून तिसरे, सहावे, दहावे व अकरावे लग्न असेल आणि त्यावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल व शुभ ग्रह युक्त असेल, चंद्र जन्मराशीपासून तिसरा, सहावा, दहाव, किंवा अकरावा असेल तर कोणतेही कार्य प्रारंभ करावे त्यात यश निश्चित मिळते, असे ज्योतिषशास्त्र म्हणते.

जन्मकुंडलीप्रमाणे व उपनयन संस्कार व लग्नाच्या गोचरी ग्रहाप्रमाणे :- व्यय स्थानात शुक्र व केतु आहेत. तसेच त्यावर षष्ठ स्थानात कुंभ रास आहे, कुंभेचा राशीस्वामी शनिच्या राशीत मंगळ धनिष्ठा स्वत:च्या नक्षत्रात (३) चरणात असून त्याची दृष्टी व्ययात आहे. त्याच प्रमाणे जन्म राशी पासून चंद्र गोचरीचा त्यादिवशी सातवा आहे. चंद्र उपनयन संस्काराच्या लग्नाच्या वेळी धनुराशीत मुळे नक्षत्रच्या (४) चरणात केतूच्या नक्षत्र आहे. त्यामुळे येथे ही एक चूक झाली आहे.

सर्वार्थसिध्दि योग:- खालील वारांच्या पुढे लिहलेले नक्षत्र असल्यावर “सर्वर्थसिध्दियोग” बनतो. कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी हा योग अत्यंत शुभ व यशदायक असतो. असे ज्योतिषशास्त्रातील विव्दान लोंक म्हणतात.

रविवार :- हस्त, मूळ, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, उत्तराफ़ाल्गुनी, पुष्य, अश्विनी.
सोमवार :- श्रवण, रोहिणी, मृगशीर्ष, पुष्य, अनुराधा.
मंगळवार :- अश्विनी, उत्तरभाद्रपदा, कृत्तिका, आश्लेषा.
बुधवार :- रोहिणी, अनुराधा, हस्त, कृत्तिका, आश्लेषा.
गुरुवार :- रेवती, अनुराधा, अश्विनी, पुनर्वसू, पुष्य.
शुक्रवार :- रेवती, अनुराधा, अश्विनी, पुनर्वसु, श्रवण.
शनिवार :- श्रवण, रोहिणी, स्वाती.

( रविवारी सर्वार्थसिध्दि योग मूळ नक्षत्र असल्याने त्यांनी हा मुहूर्त धरला तर नसेल ना? )

ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांना फ़ार महत्व आहे. गोचर भ्रमणामुळे एखादा ग्रह जन्मकुंडलीच्या शुभ स्थानातून भ्रमण करीत असेल तरीसुध्दा तो शुभ किंवा अनुकूल फ़ळ देईलच असे नाही. कोणत्या नक्षत्रातून किंवा मूळचा ग्रह भ्रमण करीत आहे हे पाहणे अनिवार्य आहे. असे केल्यानेच फ़लितात सूक्ष्मता व अचूकता येईल.

दैनंदिन मुहूर्त किंवा दिवस चांगला आहे की वाईट हे पाहण्यासाठी सुध्दा या पध्दतीचा उपयोग यशस्वी ठरतो. एखाद्या दिवसाचा चंद्र तुम्हाला अनुकूल आहे परंतु त्या दिवसाचे नक्षत्र तुमच्या जन्मनक्षत्रानुसार अनुकूल फ़लदायक नसेल तर एकटा चंद्र संपूर्ण दिवसभार शुभदायक फ़ले देणार नाही म्हणून नक्षत्र गोचर फ़ार महत्वाचे आहे.
जन्मसंपद्वित्क्षेम: प्रत्वद: साधकस्थ । नैश्वतो मित्रवर्ग इच परमो मैत्र एवच ॥

जन्मनक्षत्रापासून १, २, ४, ६, ८, ९, १०, ११, १३, १५, १७, १८, १९, २०, २१, २४, २७ हि अठरा नक्षत्रे फ़लदायक आहेत. आपल्या जन्मनक्षत्रापासून विपदकर, प्रत्वर, नैश्वन या सदरात येणारी नक्षत्रे अनिष्ट किंवा अभुभ फ़ले देतात. तसेच जन्म उत्पत्तिकर, संपतकर क्षेत्रकर, साधक, मैत्री, परमैत्री ही इष्ट नक्षत्रे अनुकूल व शुभफ़ले देतात.

जन्मनक्षत्रापासून तिसरे, पाचवे, सातवे, बारावे, चौदावे, सोळावे, एकविसावे तेवीसावे व पंचवीसावे ही ९ नक्षत्रे अनिष्ट फ़लदायी असतात.

आता विचार करा की या प्राख्यत कर्मकांड करण्या-या स्वत:ला शास्त्र माहित असलेल्या जाणकारानी हा मुहूर्त का निवडला बरे. ह्याचा परिणाम काय घडेल ह्या बालकाचा ह्यात काय दोष आहे.

जातकाचा जन्म दिनांक ०३/१२/२००१ जन्मवेळ रात्री ०१:३० डोंबिवली (महा.) बालकाचे नाव अर्थव

जातकाच्या जन्म आर्द्रा नक्षत्रात झालेला आहे. आर्द्रा नक्षत्राला मूळ नक्षत्र हे प्रत्त्वर १४ वे नक्षत्र येत आहे. त्या मुळे हे नक्षत्र १४वे आहे. मला वाटते कि हा आर्द्रा नक्षत्राचा घोटाळा मोजण्यात किंवा प्रिंटिंगची चुक असलेल्या संदर्भात होऊन चुकुन हा १४ च्या ऐवजी १५ फ़लदायी म्हणून त्यांनी धरला असावा.

जन्म लग्न कुंडली प्रमाणे मौजिबंधन लग्न कुंडली प्रमाणे
लग्न कन्या ०१.१२.४५ उत्तरा-फ़ा.(२) लग्न कर्क १२.१९.४३ पुष्य (३)

कन्या लग्नाचा स्वामी बुध तृतिय स्थानात वृश्चिक राशीत १५.४०.५५ अनुराधा नक्षत्राच्या ३ चरणात राशी स्वामी मंगळ आणि अनुराधाचा नक्षत्र स्वामी मंगळ.

मौजिबंधन लग्नाप्रमाणे वृश्चिक रास पंचमात व बुधाची मिथुन रास व्ययात शुक्र व केतुयुक्त जातकाच्या पत्रिकेत चतुर्थस्थानातील केतु धनुच्या (गुरु) मुळ नक्षत्रात द्वितीय चरणात, आणि मौजिबंधन लग्नाच्या कुंडलीत व्ययात मिथुन राशीत आर्द्रा (राहू) चतुर्थ चरणात येत आहे. जातकाला मोक्ष प्राप्तिसाठी हा मौजिबंधंनाचा योग महत्वपूर्ण आहे.

उपनयन कुंडली लग्न कर्क राशीत १२.१९.४३ पुष्य नक्षत्राच्या (३) चरणात येत आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा षष्ठात प्लुटो व राहू युक्त आहे. धनुराशीचा चंद्र ११.१२.३४ मूळ नक्षत्राच्या चतुर्थ चरणात राहूयुक्त असून व्ययातील शुक्राची व केतुची सप्तम दृष्टी त्यावर आहे. तसेच गोचरीप्रमाणॆ चंद्र हा उपनयन लग्नाच्या वेळी सप्तमात म्हणजेच जातकाच्या चतुर्थस्थानात धनु राशीत येत आहे. शास्त्राप्रमाणे ३, ६, १०, ११ वा गोचरीचा चंद्र लाभ कारक ठरतो. पण येथे गोचरीचा चंद्र सप्तमात आहे.

उपनयन संस्काराच्यावेळी केंद्रात फ़क्त एक बुध ग्रह आहे. तो पण दशमात मेष राशीत भरणी नक्षत्राच्या (३) चरणात भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र व्ययात. लग्नकालीन केतूची विशोत्तरी महादशेच्या अतंरदशेत शनिची दशा सुरु आहे. तसेच लग्न कुंडलीत राहूच्या अंतरदशेत रवि दशा सुरु आहे. लग्न कुंडलीत राहु दशमात चंद्र व गुरुयुक्त आहे. कुंडलीच्या दशमात बुधाची मिथुन रास असून बुध तृतियस्थानात शुक्र, रवि, प्लुटो युक्त आहे.


हा सर्व सामान्य नियम आहे,

अर्थव यास ०३/१२/२००१ ते २०/०४/२०१३ पर्यंत राहूची विशोत्तरी दशा आहे. सध्या राहूच्या अतंरदशेत ०७/११/२००९ पासून शुक्राची अतंरदशा सुरु आहे दशेचे वर्णन खालील प्रकारचे दिले आहे. त्या प्रमाणे त्यांच्या पिताश्रीनी त्याचा उपनयन चा कार्यक्रंम दिनांक ३० मे, २०१० रोजी का बरे ठरवीला आहे?

राहूमध्ये रवि १० महिने २४ दिवस ही आंतरदशा येताच धनवृध्दि, परदेशगमन, शासनाकडून लाभ होणार आहे. ( विमाची रक्कम किंवा त्तसम फ़ायदा मिळेल ). ०७/११/२००९ ते ०२/१०/२०१० पर्यंत रवि.

राहूमध्ये चंद्र १ वर्ष ६ महिने या आंतरदशेमध्ये कलह, बंधुवियोग, धनप्राप्ति, अनंत लाभ, सुख व सुविधा यांची प्राप्ति होते. ह्या काळात कोर्टाकचेरीमध्ये जाऊ नये गेल्यास नुकसान होईल ०२/१०/२०१० ते ०२/०४/२०१२ चंद्र.

राहूमध्ये मंगळ १ वर्ष १८ दिवस ही आंतरदशा येताच नाना प्रकारे उपद्रव,कमतरता, मानसिंक चिंता, अडीअडचणी, स्मरणशक्तिचा –हास, परिक्षेमध्ये अपयश, पदावनती होणार आहे, सुगीच्या काळात पैसै जमा करावेत. ०२/०४/२०१२ ते २०/०४/२०१३ मंगळ.

कन्या :- लग्नाच्या पंचमात मकर राशी येत. तिचा अधिपती म्हणून हर्षल ग्रह आहे; पण प्लुटो- नेपच्यूनप्रमाणेच हर्षलला स्वतंत्र दशा नसल्याने जवळचे कारकत्व शनिमध्ये असल्याने शनि व भाग्येश शुक्र यांचे संबंध कुंडलीत चांगली असावयास हवे.

कन्या लग्नाचा भाग्येश ग्रह शुक्र आहे. तसेच तो धनेशही आहे. यामुळे शुक्राची दशा कन्या लग्नाला सर्वात चागंली जाणारी असते. शुक्राच्या खालोखाल कन्या लग्नाचा दशमेश बुध असल्याने व तो लग्नेश असल्याने बुधाची दशासुध्दा कन्या लग्नाला चांगली जाते. मात्र हे दोन्ही ग्रह मूळ कुंडलीत सुस्थितीत असावे लागतात. या ग्रहांना शक्यतो राशीगत बल व नवमांश बल यांपेकी काहीतरी असावे लागते. तसेच हे दोन्ही ग्रह अर्थवची मनस्थिती ठरविण्यात महत्वाचा वाटा उचलत असल्याने ज्या प्रमाणात ते मूळ कुंडलीत शुभ आहेत. त्याप्रमाणात त्यांचे फ़ल जातकाला त्यांच्या दशाकालात अथवा इतर ग्रहांच्या बुध-शुक्राची युतीच्या अंतर्दशा चांगली जाते. कन्या लग्नाचा अष्टमेश मंगळ आहे म्हणून या ग्रहाची दशा कन्या लग्नाला सर्वसाधारण्पणे चांगली जात नाही. पण हा मंगळ कुंडलीत भावबली व चांगल्या नवमांशात असता या ग्रहाची दशा सुध्दा चांगली जाते अर्थव च्या कुंडलीत नवमांश मंगळ दशमात आहे. आरोग्याच्या दृष्टीने जरी या मंगळाचा त्रास जातकाला होईल, पण उत्कर्षाच्या दृष्टीने मात्र हा मंगळ जातकाला सातत्याने पुढे नेण्याचाच प्रयत्न करेल. कन्या लग्नाला मारकेश गुरु असल्याने मीन राशीच्या अधिपती नेपच्यून असून दशेमध्ये सुखस्थानाचाही अधिपती आहे. यामुळे गुरुची महादशा कन्या लग्नाला चांगली जात जाईल, पण हे अर्धसत्य आहे. हा गुरु मूळ कुंडलीत दशमात आहे.. गुरु हा आध्यात्मिक ग्रह असल्याने स्वत:च्या संसारात त्या जातकाची तेवढी समरसता दिसून येणार नाही. पण आर्थिक आणि भौतिक प्रगती चांगली असल्याचे दिसून येईल. कन्या लग्नाला चंद्र हा लाभेश आहे. चंद्राच्या अंमल माणसाच्या मनावर असतो. शरीरातील रक्तभिसरण, शरीरातील पाणी, चयापचय संस्था यावरही चंद्राचा अंमल असतो. हा चंद्र कन्या लग्नाचा षष्ठाचा-षष्ठ स्थानाचा अधिपती झाल्याने आरोग्यजातकाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरतो.

टिप:- माझ्या मते दशमातील राहूची दशा सध्या सुरु आहे. त्यानतंर गुरुची दशमातील दशा सुरु होणार आहे. गुरु + राहू ( गुरु (वक्रि) मिथुन राशीत २०.१९.३६ अंशावर पुनर्वसू नक्षत्राच्या प्रथम चरणात तर राहू (व) ०४.०१.३४ मृग नक्षत्राचा (४) चरणात आहे ) गुरु + राहू जर का एका राशीत असले तर तो चांडाळ योग होतो.) दशमातील चांडाळ योग हा जातकाला चांगला नाही असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. पण दोघाचा राशी स्वामी एक आहे; गुरु व राहू मिथुन राशीत आहे, त्यामुळे त्याचे स्वामी एक आहेत. पण नक्षत्र स्वामी वेगवेगळे आहेत. गुरु चे नक्षत्र पुनर्वसू व त्याचा स्वामी गुरु व राहूचे नक्षत्र मृग त्याचा स्वामी मंगळ आहे. आता गुरु व मंगळ युध्दास प्रारंभ झाला आहे. ह्याचे गोष्टीचे विश्लेषण मी या ठिकाणी करणार नाही.

अशुभ दृष्टी :- जो ग्रह अशुभ दृष्टीने युक्त असतो त्याचे दशेत संततिबाधा, अग्निभय, ताबेदारी, मातापित्यापैकी कोणाचा तरी मृत्यू, पैशाची नुकसानी वगैरे गोष्टी संभवतात.

फ़लदेश पाहताना दशांचा फ़लादेश विचारात घेणे जरुर आहे. त्याच वेळी ग्रहावरील सूक्ष्म स्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक ग्रहाचे उच्च नवांश, नीच नंवाश, पाप षष्ठांश, चेष्टाबळ, वगैरे स्थिती पाहिली पाहिजे. त्यानुसार निर्णायकफ़ल घेतले पाहिजे, म्हणजे भविष्य तंतोतंत खरे येते.

• दशमेशाच्या दशेत धनप्राप्ति होऊन राजमान्यता वाढते. त्या प्रमाणे दशमात राहू असल्याने जातकासा राजमान्यता प्राप्त झाली आहे. दशमेची दशा सध्या सुरु आहे.
• गोचर रविच्या नक्षत्रापासून जातकाचे नक्षत्र २६ वे रोहिणी आहे. त्यामुळे जातकास हे चांगले नाही.
• आचार्य गर्ग यांच्या मतानुसार चंद्रस्थित नक्षत्रापासून जातकाचे जन्मनक्षत्रची स्थिती १४ वी असल्याने हा मुहूर्त शुभ व ह्रदयात असल्याने दांपत्यसुखासाठी चांगला म्हणून धरला आहे का?.
• तसेच चंद्र नक्षत्रापासून जन्मनक्षत्रापर्यंत १३ ते १८ मधील नक्षत्रामध्ये येत असल्याने ते जातकाच्या हातावर पडत आहे. हातावर नक्षत्र पडल्यामुळे जातकाला धनलाभ मिळण्याची शक्यता धरुन हा मुहूर्त काढला तर नसेल ना?
• मंगळ-नक्षत्र गोचर फ़ल:- राशी गोचर प्रमाणॆच आचार्य गर्ग आणि लल्ल यांनी मंगळाच्या नक्षत्रा विषयी काही विश्लेषण केलेले आहे. तसेच महर्षि गर्ग यांच्या मते मंगळ स्थित नक्षत्रापासून जन्म नक्षत्रापर्यंत गणती सुरु करावे. तसेच आचार्य गर्ग यांच्या मते गोचर मंगळाच्या नक्षत्रापासून आपले जन्म नक्षत्र जेथे पडेल त्याप्रमाणे फ़लित समजावे.
१. १ ते ३ मुखात रुचकर भोजन, सुख्य
२. ४ ते ७ राजसन्मान, प्रतिष्ठा प्राप्ती ( जातकाचे मंगळ गोचर ह्या नक्षत्रात आहे )
३. ८ ते ११ बाहुत या पैकी ८,९ उजव्या हातात- यशदायक.
अशी अशुभ फ़ले १० ते ११ ( डाव्या हातात-
रोगकारक,त्रासदायक, अनिष्ठफ़ल).
४. १२ ते १३ गळ्यात उचकी लागणॆ, चिंताकारक.
५. १४ ते १८ ह्रदयात धनलाभ, आर्थिक स्थितीत सुधारणा
६. १९ ते २१ पायात भ्रमण प्रवास.

याप्रमाणे गोचरीचा मंगळ हा जन्मनक्षत्रापासून पाचवा प्रत्यरी मद्या नक्षत्राच्या (१) चरणात आहे. तसा मंगळ षष्ठस्थानाचा वाईट फ़ले देत नाही तो शत्रुला नामोहरण करत असतो. गोचरीचा मंगळ द्वितीय धनस्थानाचा अधिपती केतूच्या मद्या नक्षत्रात नेपच्यूच्या दृष्टीत आहे. दशमातील राहुच्या दशाफलाप्रमाणे राहु दशमात रविबरोबर असल्याने अर्थवच्या पित्याला हानिकारक आहे (दशेपुरते मर्यादीत).

अर्थवच्या कुंडलीत नवमस्थानातील वृषभ राशीतील रोहिणी (३) चरणातील वक्री शनी गोचरी भ्रमणात तृतीयस्थानात वक्री असून तो कन्या राशीत उत्तर-फ़ा. नक्षत्राच्या (३) चरणात आहे. त्याच्या सप्तमात गुरु व हर्षल हे ग्रह आहेत. त्यामुळे जातकाला गुरुचा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

अर्थवचा जन्मलग्न च्यावेळी पुर्व क्षितीज्यावर कन्या लग्न उदित होते. कन्या ही द्विस्वभाव व पृथ्वीराशी लग्नी उदित आहे. असा जातक शांत सकोच वृत्तीचा विनयी व आतल्यागाटीचा असतो. कन्या लग्नाचे लोंक कोणातेही काम दूरवर विचार केल्या खेरीज हाती घेत नाही. अर्थवचे अत:करण दयाळु व प्रेमळ आहे. परंतु दुस-याच्या भाडगडीत पडण्याची त्याची इच्छा होणार नाही. व्यवहारात कसे वागावे हे ह्या जातकाला चांगले कळते. व त्याचा खरा स्वभाव कोणालाही समजणार नाही. अर्थवची बुद्धी तीव्र असुन कोणतेही गोष्ट याला लवकर समजते.

अर्थवाचे मन अभ्यासू वृत्तीचे आहे. शास्त्रीय विषय व वाड्‌.मय यात बुध्दी चालते. कल्पना व तर्क चांगला आहे. योजकपणा व बारकाई, मतलबीपणा व अतिषय लोभ हे ह्या जातकाचे मोठे दुर्गुण आहेत.

स्वत:ची खात्री झाल्याशिवाय अर्थव कोणात्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. निरिक्षण व चिकित्साबुध्दी चांगली आहे. व्यवहार दक्षता व पध्दतशीरपणा हे मोठे सदगुण अर्थवमध्ये दिसून येतील. किरकोळ कामे सुध्दा अर्थव पध्दशिरपणे करणार. कधी कधी कारण नसताना मानसिक त्रास करुन घेईल. व कारण नसताना तो आपले मत बदलेल. आत्मविश्वास कमी व स्वत:च्या सामर्थ्याबद्दल साशंकपणा आहे.

संकटाच्या वेळी ह्याचे धर्य डळमळुन तो घाबरुन जाईल. हा निराशावादी आहे. योग्य पुढाराच्या नेतृत्वाखाली अर्थव उत्तम प्रकारे काम करू शकतो. सेवावृत्ती हा त्याचा मुख्य धर्म आहे.

लिहण्यासारखे बरेच काही आहे. परंतु सौभाग्यवतीने येथेच पुर्णविराम करण्याची आज्ञा दिल्याने आम्ही येथेच पुर्णविराम करत आहोत. अर्थवला सर्व ग्रह-नक्षत्राची शुभ फ़ले लाभोत ही श्री व स्वामी चरणी प्रार्थना.
शुभं-भवतु.
स्वामी भक्त.

तळटिप:- हा विधि करण्याअगोदर महामृत्युंजय जप तसेच नवग्रह शांती करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: